कॉमेडीयन सुनील पालला सोशल मीडियावरुन धमक्या, व्हिडीओ जारी
चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा : हास्यसम्राट सुनील पाल यांनी वर्ध्यातील भाजप नेते दत्ता मेघे सावंगी येथील रुग्णालयाविरोधात आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या बहिणीचा जीव गेला असा त्यांचा आरोप आहे. बहिणीवर अंत्यंस्कार केल्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ जारी करत या रुग्णालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिला आहे. शिवाय यामुळे […]
चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा : हास्यसम्राट सुनील पाल यांनी वर्ध्यातील भाजप नेते दत्ता मेघे सावंगी येथील रुग्णालयाविरोधात आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या बहिणीचा जीव गेला असा त्यांचा आरोप आहे. बहिणीवर अंत्यंस्कार केल्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ जारी करत या रुग्णालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिला आहे. शिवाय यामुळे काही डॉक्टरांकडून मला धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सावंगीतील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दोन दिवसांपासून भरती असलेल्या कॉमेडीयन सुनील पाल यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. या रुग्णालयात येऊन हास्यसम्राट सुनील पाल यांनी बहिणीची भेट घेतली. दोन दिवसांपासून समाधानकारक उपचार होत नसल्याने डॉक्टरांनाच त्यांनी जाब विचारला.
एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉक्टरांकडून आयसीयूमध्ये उपचार होत असल्याचं समोर आलं आहे. सुनील पाल यांनी त्याचा एक विडिओ काढून तो व्हायरल केला. गुरुवारी रात्री व्हायरल केलेल्या व्हिडीओनंतर त्यांनी या रुग्णालयाचा परवानाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
सावंगी रुग्णालयात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पाल यांनी त्वरित आपल्या बहिणीला तेथून उपचारासाठी नागपूरला शिफ्ट केलं. पण नागपूरला त्यांना आपली बहीण गमवावी लागली. योग्य उपचार न करणाऱ्या सावंगी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे. सावंगी येथील रुग्णालय रुग्णालय नसून दुकानदारी असल्याचा घणाघाती आरोप पाल यांनी केला. महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भाच्या जनतेने या घटनेची दखल घ्यावी, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.
सुनील पाल यांचे आरोप रुग्णालयाने फेटाळले आहेत. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शिरून व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. सोबतच पाल यांच्या बहिणीला सुरुवातीला त्यांनी हिंगणघाट येथे उपचार करून आणलं होतं. रुग्णालयाने कोणतीही हलगर्जी केली नसून त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, असं स्पष्टीकरण रुग्णालयाने दिलंय.