भाजपने खरंच स्वबळावर लढून पाहावं, बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Balasaheb Thorat answer Devendra Fadnavis).
![भाजपने खरंच स्वबळावर लढून पाहावं, बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान भाजपने खरंच स्वबळावर लढून पाहावं, बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/07/27201019/Balasaheb-Thorat_Devendra-Fadnavis.jpg?w=1280)
मुंबई : भाजपने महाराष्ट्रात खरंच स्वबळावर लढून पाहावं, असं आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. “भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे कमी आमदार निवडून येतील”, असा टोलादेखील बाळासाहेब थोरात यांनी लगावला. महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणी बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला.
“आमचं सरकार सुरळीत सुरु आहे. कोरोना संकट काळात सरकार चांगलं काम करत आहे. केंद्र सरकारने तर राज्याचा हक्काचा निधीदेखील दिला नाही. केंद्राने एनडीआरएफच्या निधी व्यतिरिक्त कोणता निधी दिला?”, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. त्याचबरोबर भाजपच्या टीकांमध्ये तथ्य नाही”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
दरम्यान, “राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत,” अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेलादेखील बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा : रिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात : फडणवीस
“शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अनुभवाचा आम्हाला उपयोग होतो. सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे सुरु आहे”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. “आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे” असेही फडणवीस म्हणाले.