टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे होणार आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर बांगलादेश मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे. अशात दुसरा सामना हा एका स्टार ऑलराउंडरचा भारतातील अखेरचा कसोटी सामना असणार आहे. तो खेळाडू कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात.
बांगलादेशचा ऑलराउंडर आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन याने कसोटी-टी 20i क्रिकेटमधून निवृ्त्ती जाहीर केली आहे. कानपूर कसोटी सामन्याच्या काही तासांआधी शाकिबने ही घोषणा केली आहे. शाकिब टी 20i क्रिकेटमधून तात्काळ प्रभावाने निवृत्त झाला आहे. तर मायदेशातील दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचं शाकिबने सांगितलंय. त्यानुसार शाकिबचा भारतातील हा दुसरा सामना अखेरचा असणार आहे. त्यामुळे बांगलदेशच्या इतर खेळाडूंचा शाकिबला विजयासह भारतातून निरोप देण्याचा मानस असणार आहे.
भारत- बांगलादेश यांच्यात कसोटीनंतर टी20i मालिका होणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. शाकिबला या टी 20i मालिका खेळून निवृत्त होता आलं असतं. मात्र शाकिबने तसा निर्णय घेतला नाही. त्यामुळे दुसरा कसोटी सामना हा शाकिबसाठी भारतातील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याचं निश्चित झालं आहे. शाकिबला पहिल्या कसोटीत आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे आता शाकिब जाता जाता काय करतो आणि कसा खेळतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.