Sanjay Raut : ‘त्यांना आजार झालाय, इलाजाची गरज आहे’; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
Sanjay Raut Criticized DCM Eknath Shinde : वक्फ बोर्डाच्या विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळालेली आहे. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंच्या पाठीला कणा लावण्याची गरज आहे. ते दिल्लीपुढे जाऊन वारंवार वाकतात, झुकतात. त्यांना माना डोलवण्याचा आजार झाला आहे. त्यावर त्यांना उपचाराची गरज आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मी डॉक्टर नसलो तरी अनेकांचे ऑपरेशन केले आहेत, अनेकांच्या मानेचे आणि कंबरेचे पट्टे निघून गेले, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं होतं. त्यावर आज संजय राऊत यांनी टीका केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत. आता फक्त या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मुस्लिमांच्या जमिनींवर कब्जा करण्याचा डाव आहे. गरीब मुसलमानांना यातून खूप मोठा उद्धार होणार आहे, ही जी काही भाषा काल केली, हे पूर्णपणे ढोंग आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. आम्ही 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे आणि दर्गा यांना हात लावणार नाही. पण, रिक्त जमिनीची विक्री करू. नकळत त्यांच्या तोंडातून हे सत्य बाहेर पडलं की, मोकळ्या जमिनीचा आम्ही सौदा करू. या मोकळ्या जमिनीची किंमत दोन लाख कोटी आहे, असंही राऊतांनी सांगितलं.