मुंबई केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. सणासुदीचे दिवस आणि आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिरे आणि इतर महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, जुहूतील इस्कॉन मंदिर आदी मंदिरात सुरक्षा वाढविली आहे. मुंबईत नुकताच गणपती उत्सव उत्साहात आणि सुरक्षितरित्या पार पडला आहे. आता मुंबईत नवरात्रोत्सव सुरु होणार आहेत. त्यानंतर दसरा आणि दिवाळी असा सणासुदीच्या माहोल असणार आहेत. या पार्श्वभूमीवर हायअलर्ट आल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी मॉकड्रील देखील केली आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. मुंबईच्या दादर येथील डिसिल्वा शाळे जवळील बसस्टॉपवर जुलै 2011 रोजी ब्लास्ट झाला होता.त्यानंतर मुंबईत आतापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. तरीही पोलिस यंत्रणांना अलर्ट राहून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.