नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये, प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Jan 06, 2024 | 10:04 PM

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सहा महिन्याच्या आत तुरुंगात दिसतील असा खळबळजनक दावा केला आहे. एकीकडे अमरावती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Follow us on

अमरावती | 6 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूकांची घोषणा लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची लोकसभा उमेदवारांची चाचपणी सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे. नवनीत राणा सहा महिन्यांच्या आत जेलमध्ये दिसतील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नवनीत राणा या सध्या मुलुंड कोर्टात घिरट्या घालीत आहेत. त्या लवकरच तुरुंगात जातील असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रा प्रकरणाचा निकाल सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे. हनुमान चालिसा प्रकरणात नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये रहावे लागले. याच प्रकरणाचा दाखला बहुतेक आंबेडकरांनी दिला आहे.नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप आहे. जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केल्याचे उघड झाले होते. माजी खासदार आनंदराव अडसूळ, सुनील भालेराव यांनी यासंदर्भात याचिका कोर्टात दाखल केली होती. यानंतर मुंबई हायकोर्टाने 8 जून 2021 रोजी त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द केले होते. मुंबई हायकोर्टाने यानंतर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हायकोर्टाच्या निकालाने नवनीत राणांची खासदारकी धोक्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. अमरावती मतदार संघावर महायुतीतील पक्षांनी दावा केला आहे. युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा दावा केला आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही अमरावती मतदार संघावर दावा केला आहे, शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी हा मतदार संघावर दावा केला आहे. बच्चू कडूंनी नवनीत राणांना प्रहारच्या तिकीटावर लढण्याची ऑफर दिली होती. यानंतर बच्चू कडूंना नवनीत राणांना टोला लगावला होता. आता प्रकाश आंबेडकरांचा दावा कितपत खरा ठरतो आणि नवनीत राणा काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.