मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात त्यांच्या कारवर बीड येथे सुपाऱ्या फेकण्यात आल्याने त्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांना जो गरीब असेल त्याला आरक्षण मिळायला हवे अशी मागणी केली. आरक्षण आर्थिक निकषावर दिले जावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात स्वत:च्या जातीबद्दल अस्मिता आणि अभिमान सगळ्यांना आहे, परंतू दुसऱ्यांच्या जातील बद्दल तिरस्कार कधी नव्हता. तो आता होत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दल कमालीचा तिरस्कार सुरु करण्यात आला. शरद पवार यांच्या पक्ष स्थापनेनंतर जेम्स लेन प्रकरणावरुन जातीय तेढ सुरु झाली. आता मनोज जरांगे यांना पुढे करुन शरद पवार येत्या तीन महिन्यात जेवढ्या म्हणून दंगली घडवायच्या आहेत त्या घडवतील खास करुन मराठवाड्यात त्या घडविल्या जातील असा आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीवर केला आहे.