मुंबई : राज्यातील बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय. काल मुंबईत विजेच्या कडकडांसहीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आज मुंबईत कडकडीत ऊन पाहायला मिळतंय. एकीकडे शेतकर्यांचं पुन्हा नुकसान झालंय, तर दुसरीकडे महाराष्ट्रासहीत मुंबईतही उष्णतेची लाट अनुभवायला मिळतेय. मुंबईत तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत चढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत सध्या तापमान 38 डीग्री सेल्सियसवर पोहचलंय तर हवेतील आर्द्रता 41 इतकी नोंदवली गेलीये. त्यामुळे मुंबईत नेमका कोणता ऋतू सुरू आहे? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान राज्यात दोन दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच तापमान वाढीचाही अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन चार दिवसांत तापमान 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.