कल्याण : काही दिवसांपासून कल्याण हा शिंदे गट आणि भाजपमधल्या वादाचा कळीचा मुद्दा ठरला आहे. येथे खासदार श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध झाला होता. त्यानंतर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री कुठे हरविले? अशी फलकबाजी शंभूराज देसाई यांच्यावरून करण्यात आली होती. या गोष्टीला काहीच दिवस होण्याआधीच आता मीरा-भाईंदरमध्ये अनेक गुन्हे घडूनसुद्धा पालकमंत्री व प्रशासन झोपले आहे का असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सरकारला करण्यात आला. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांकडून ‘पालकमंत्री हरवले आहेत! आपण त्यांना पाहिलंत का?’ अशी फलकबाजी शहरात करण्यात आली आहे. त्यानरून शंभूराज देसाई यांनी आता उत्तर दिलं आहे. त्यांनी मी कोठे आहे ते बघा, ज्यांना काही काम नाही ते असेच उद्योग करतात असा टोला लगावला आहे. त्यामुळे आता मीरा-भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.