गावबंदी, जाळपोळ असेच होत राहील तर मणिपूरची पुनरावृत्ती, प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा

| Updated on: Nov 16, 2023 | 11:36 PM

महाराष्ट्राने अशी आंदोलनं पाहिली नाही. गावबंदी, जाळपोळ होत आहे, हे असेच होत राहील तर मणिपूरची पुनरावृत्तीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बीड मधील हिंसक घटनेतील मास्टर माईंड सरकारला सापडत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही शोधून देऊ.

Follow us on

नांदेड | 16 नोव्हेंबर 2023 : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाची सभा होणार आहे. ही सभा ऐतिहासिक होणार असुन ओबीसीचे राज्यातील सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली. या सभेला छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलन होत आहेत. आमदाराची घरे जाळली जात आहे. आम्ही सरकारकडे ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली. काही नेत्याना सरकारने सुरक्षा दिली. पण, काही नेत्यांना दिली नाही. आम्ही आमची सुरक्षा करण्यास सक्षम आहोत. मात्र, त्यानंतर जे घडेल त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. त्यात मारवाडी आणि जैन समाजाच्या नोंदीदेखील सापडल्या आहेत. मग, त्यांना पण ओबीसीतुन आरक्षण द्यायचं का असा सवालही त्यांनी केला.