यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल असे म्हटले जात होते. परंतू जून महिन्यात पावसाने ओढ देत सर्वांनाच गंडविले आणि हवामान खात्याचे अंदाज खोटे पाडले. परंतू जुलै महिन्याची सुरुवात पावसाने दणक्यात एण्ट्री केली आहे. आता पावसाबदद्ल हवामान विभागाने पुन्हा आपला अंदाज वर्तविला आहे. कालपासून मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरासह राज्यातील अनेक जिल्ह्यात नद्यांना पुर आणला आहे. या पावसाने हवेत गारवा वाढला आहे. परंतू या पावसाने मुंबई आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरात पूरजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. मुंबईत काल रात्री सहा तासात 300 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे अनेक सखल भागात वाहने अडकून पडली आहेत. बेस्ट प्रशासनाच्या 32 बस पावसाच्या पाण्याने बिघडून जागोजागी अडकून पडल्या आहेत. तसेच बेस्टने मुंबईतील बसमार्गांना अन्यत्र वळविले आहे. पुढील 24 तासांत मुंबई ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान विभागाचे अधिकार कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर आणि सातारा विभागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन ते चार दिवस कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईकरांना हवामान विभागाच्या पूर्वअनुमानांची दखल घेऊन आपली काळजी घ्यावी असेही होसाळीकर यांनी म्हटले आहे.