कोल्हापूर, 26 जुलै 2023 | कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पंचगंगा नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढ होत आहे. तर सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून तिची वाटचाल ही धोका पातळीकडे होत आहे. याचदरम्यान आता राधानगरी धरण देखील 100 टक्के भरलं असून कोल्हापुरकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. जोरदार पाऊसामुळे राधानगरी धरणाचे सात पैकी पाच स्वयंचलित दरवाजे उडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आलाय. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता असून कोल्हापूरला 2016, 2019 नंतर आता 2023 मध्ये पुन्हा एकदा पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे.