नंदुरबार | 14 मार्च 2024 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ अंतिम टप्प्यात महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात पोहचली आहे. नंदूरबार जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या आदिवासी जिल्ह्यात राहुल गांधी यांनी रतीबाई भिल यांच्या घरी अचानक भेट दिली. त्यांनी यावेळी कॉंग्रेसचे सरकार आल्यास महिलांना एक लाख रुपये देण्याची योजना सांगितली. तसेच या आदिवासी कुटुंबाला काय अडचणींचा सामना करावा लागतो. महिन्याला किती कमाई होते ? असे प्रश्न विचारले. आदिवासींना जात प्रमाणपत्र मिळण्यास खुप अडचणी येत असल्याचे या कुटुंबातील मुलाने सांगितले. तसेच पाण्याची टंचाई आणि वाढत्या महागाईने जर कोणी आजारी पडले तर उधारीने पैसे घेऊन उपचार करावे लागत असल्याचे रतीबाई भिल यांनी सांगितले.