अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचं सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री ३ वाजेपासून मैदानी चाचणीकरता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. पावसामुळे मैदान खराब असल्याने चिखलात सुरू असलेल्या मैदानी चाचणीला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. काल दुपारपासून अमरावतीत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर ज्या ठिकाणी मैदानी चाचणी होती ते मैदान पूर्णतः पावसाच्या पाण्याने आणि चिखलाने भरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हजारोच्या संख्येने महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीकरता आले आहेत. मात्र पावसामुळे मैदानी चाचणीचं मैदान चिखलानं भरलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीकरता प्रक्रिया सुरू केली आहे.