पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती पूजनासाठी गेले होते. त्यावरुन विरोधक टीका करत आहेत. संजय राऊत यांनीही यावरून निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटवर टीका करताना राऊत म्हणाले, “सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अशा पद्धतीने राजकीय नेत्यासोबत खासगी भेटी करणे सर्वस्वी चुकीचं आहे. गेल्या तीन वर्षांपासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारचा खटला सुरु आहे. जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळालं तेव्हा ते म्हणाले होते की मोदी आणि शाह यांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं. त्यामुळे सरकार टिकलं. याचा अर्थ काय? सर्वोच न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थावर दबाव आणून त्यांना हे सरकारने दिलं. त्या चंद्रचूड यांना पंतप्रधान भेटतात तेव्हा हा देशाच्या लोकशाहीला धोक्याची घंटा वाजवणारा प्रसंग आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केलाय. ‘ज्यांना बुद्धीचा लकवा मारलाय आणि भैसाटलेल्या मनस्थितीत असलेल्या माणसाची जी वक्तव्य असतात तशी संजय राऊत यांची वक्तव्य आहेत. ‘, असे शेलार म्हणाले.