उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. त्यांचा केवळ ४८ मतांनी विजय झाला होता. आता रवींद्र वायकर यांनी विजय मॅनेज केला असं म्हणत दोन अपक्ष उमेदवारांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि जनआधार पार्टीचे सुरिंदर अरोरा मोहन यांनी ही तक्रार रवींद्र वायकर यांच्याविरोधात केली आहे. पोलीस कारवाई करत नसून पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचे भरत शहा यांनी म्हटलंय. दरम्यान रवींद्र वायकर यांची शपथ होण्याआधी यासंदर्भात कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. यांच्याविरोधात गजानन किर्तीकर यांचे पूत्र अमोल किर्तीकर हे रिंगणात होते. त्यामुळे दोघांना ही लढत कठीण जाणार अशी चर्चा होती. अखेर मतमोजणीत अवघ्या ४८ मतांच्या फरकांनी रवींद्र वायकर लोकसभा निवडणूक जिंकले.