मुंबई : राज्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. मुंबई, कोकणात समुद्राच्या अंतरंगात बदल झाला असून उंच लाटा निर्माण होणार आहे. माच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, काल गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली होती. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांमध्ये शिरले होते. त्यात पर्यटकांचे सामान देखील वाहून गेले होते. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी आले होते. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याने समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली होती. तर बिपरजॉय चक्रवादळामुळे या लाटा उसळल्याचं सांगितलं जात आहे. या वादळाचा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा बसल्याने समुद्र किनारी मोठ्या लाटा उसळल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत समुद्र शांत होत नाही, तोपर्यंत कुणीही समुद्र किनाऱ्यावर फिरकू नये, असे आदेशच जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तसेच पर्यटक या काळात समुद्र किनारी जाऊ नये म्हणून प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहेत.