बुलढाणा, २ सप्टेंबर २०२३ | जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी काल शुक्रवारी लाठीमार केला. या घटनेत पोलीस आणि आंदोलक दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी कुठेही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठेही गालबोट लागले नाही. मात्र शुक्रवारी या प्रकरणास गालबोट लागले. मराठा समाजास संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगतीकडे नेले आहे. यामुळे या घटनेची चौकशी केली पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तर या घटनेवरून कोणीही राजकारण करून नये, आंदोलक, जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी जरूर यावे, पण राजकारण करून नये, असे आवाहनच बावनकुळे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.