डोंबिवली, २६ ऑगस्ट २०२३ | मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासियांना होणारा त्रास लक्षात घेता मनसेच्या वतीने २७ ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संपूर्ण कोकणात महामार्गावर लोकशाही पद्धतीने विविध ठिकाणी पदयात्रा काढून सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १९० किमीमध्ये आठ टप्प्यात हे आंदोलन केले जाणार आहे. यावर भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘माझं या संदर्भात कालच राज ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे त्यांनी सांगितलं आहे, आम्ही या रस्त्याने पदयात्रा काढणार आहोत. लोकशाही मार्गाने पदयात्रा त्यांनी काढावी यात काहीच अडचण नाही, माझी एवढीच विनंती आहे, रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या कामाला कुठेही अडथळा येऊ नये’, असे म्हणत रविंद्र चव्हाण यांनी राज ठाकरे यांना विनंती केली आहे.