बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकच मागणी लावून धरली आहे. गेल्या सात ते आठ तासांपासून बदलपूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी रेल रोको केला आहे. यामुळे मुंबईची लाईफ लाईन आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प झाल्या आहेत, तर काहींचा रेल्वे मार्ग बदलला आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करून देखील आंदोलक काही मागे घटण्यास तयार नाही. अशातच सरकारचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर स्थानकात आक्रमक आंदोलकांची भेट घेतली. गिरीश महाजन येताच आंदोलकांनी ‘फाशी…फाशी…’ अशा घोषणाबाजी सुरु केली. यावेळी गिरीश महाजन यांनी नागरिकांना असा रेल रोको करून प्रश्न सुटणार आहे का? असे म्हणत शांतता राखण्याचे आवाहन केले. तर तुम्हाला हवं तेच होईल, तुमचं म्हणणं जे आहे तेच सरकारचं आहे. आरोपीवर कायदेशीर मार्गाने कारवाई होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं.