मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबद्दल राहुल गांधी यांना प्रश्न विचारणार का? असा सवाल भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपस्थित केला आहे. इतकंच नाहीतर राहुल गांधी हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणतील का? असे वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांना प्रसाद लाड यांनी खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. तुम्ही सत्तेत आहात तर तुम्ही आरक्षण द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण द्यायचं सोडून इतरांवर कशाला बोलायला सांगता? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.