सरकारने रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पाच दिवसांत कारवाई करा, अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी बुधवारी सरकारकडे केली. नुसती मागणीच नाहीतर यावेळी त्यांनी सरकारला इशाराच दिला, ते म्हणाले, जर सरकारने कारवाई केली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल. जलील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “रामगिरी महाराजांनी मुस्लीम धर्माविरोधात काही शब्द वापरले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर देशभर संताप उसळला. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळ बसून त्यांच्या सुरक्षेची बाजू मांडली.” जलील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ज्याच्या नावात जलील आहे तो काय धमकी देणार? हात लावून दाखवा, हा धमकी देणारा माणूस कोण आहे? चिरकूट माणूस आहे. त्याच्या धमकीला कोण घाबरते कोण?’, असा खोचक सवाल निलेश राणेंनी केला.