पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याबाबत सर्वात मोठं विधान केलं आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या आधीच पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसतेय. ‘भगवान भक्ती गडावर मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे. सात वर्षांच्यावर सावरगाव येथे हा मेळावा होत आहे. त्या ठिकाणी आम्ही भगवान बाबांची मूर्ती निर्माण केली आहे. दरवर्षी आम्ही तिथे जातो सोनं लुटतो आणि सिमोलंघन करतो’, असे पंकजा मुंडेंनी सांगितले. तर पहिल्यांदाच मुंडे बंधू-भगिनीचा दसरा मेळावा भगवानगडावर होणार आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे आणि मी आम्ही एकत्र कधीच दसरा मेळावा केला नाही दसरा मेळावा हा मुंडे साहेबांचा असायचा, आणि आम्ही समोर मांडी घालून बसलेला असायचो. आता आम्ही पहिल्यांदा एकत्र मेळावा घेत असलो तरी आम्हाला एकाच मंचावर येण्याची सवय झाली आहे. या भगवानगडावरून मी संदेश देत असते. यावर्षी पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची मलाही उत्सुकता आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तर आमचा मेळावा पारंपारिक आहे, तो मेळावा काही पारंपारिक नाही. ओबीसी मराठा संघर्षावर मी माझ्या भाषणात बोलणार. ओबीसी मराठा संघर्ष असा रंग माझ्या मेळाव्याला नसणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच माझा मेळावा येत असतो, मात्र हे काही राजकीय व्यासपीठ नाही. मात्र माझ्या भाषणातून सामाजिक, राजकीय संदेश नक्की दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले.