शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा; भाजप नेत्याची मागणी

| Updated on: Sep 05, 2024 | 5:10 PM

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद... महसूल व वन विभागाने परिपत्रक काढले, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले. इतकेच नाहीतर 'लाडकी बहीण' चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना? शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे 'लाडकी बहीण' योजनेला दिल्याचे म्हणत आव्हाडांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावर भाजप आमदाराने पलटवार केलाय.

Follow us on

राज्याच्या महसूल व वन विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या मदत निधीवरून सवाल केला असता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल केला. या टीकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार करत जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच फटकारलं आहे. ‘लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या योजनेला जमेल तितके बदनाम करण्याचे काम सुरू आहे. खोट्यानाट्या कंड्या पिकवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येतो आहे. जितेंद्र आव्हाड यांना शासकीय कार्यपद्धती कळू नये, आणि साधा GR चा अर्थ समजू नये, हे कळण्या पलिकडचे आहे. वित्त विभागाने फक्त खर्चाचा हेड बदलला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना यापुढेही मदत मिळणे सुरूच राहणार आहे. माहिती न घेता अफवा पसरवून आव्हाड शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. या फेक न्युज प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे’, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केलाय.