मालवणमध्ये बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला आहे. त्यामुळे शिवप्रेमींसह विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र फक्त ८ महिने २२ दिवसात शिवरायांचा हा भव्य पुतळा कोसळला आहे. ४५ प्रति किमी वेगाने वारा वाहत असल्याने शिवरायांच्या पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर शिवरायांचा हा पुतळा कोसळताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी रॉडने सार्वजनिक विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हे दाखल करा, नाहीतर राज्यभर आंदोलन करू, असा इशाराच वैभव नाईक यांनी दिला आहे. यानंतर पुतळा तात्काळ उभारण्यात येणार असून कायदा हातात घेण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं आहे.