Devendra Fadnavis Video : नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्टच सांगितलं…
'जोपर्यंत दंगलखोरांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहील. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देणार आहे.'
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून नागपुरात सोमवारी मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. दोन ते तीन दिवस नागपुरात या हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता पसरली होती. या राड्यात हिंसक जमावाने आक्रमक होत दगडफेक करत काही वाहनांची तोडफोड केली होती. तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली होती. या राड्यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समोर आले. नागपुरातील या हिसांचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत घडलेल्या हिंसाचार प्रकरणाचा सर्व आढावा घेतला. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. ‘आतापर्यंत १०४ लोकांना अटक केली आहे. त्यात ९२ लोक आहेत आणि १२ लहान मुलं आहेत. जोपर्यंत शेवटच्या दंगेखोराला पकडलं जात नाही तोपर्यंत अटक सत्र सुरू राहील’, असे फडणवीसांनी सांगितले. तर कोणत्याही प्रकारे कुणाला दंगा करून दुसऱ्यांचं नुकसान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळेच दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार आहोत, अशी भूमिका फडणवीसांनी जाहीर केली.