कुणी जर चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे. कुणी चांगलं काम करतो आहे तर त्याच्यावर टीका करून पोट भरायचं हे काम आपल्याला कधी जमलं नाही. आम्ही सगळं काम कृतीत करतो. मी गरिबी पाहिलेला माणूस, शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती नव्हती, त्या काळात मात्र आम्हाला गुरुजनांनी मोठे केलं. शाळेत मी फार काही हुशार नव्हतो. माझा डीएडला नंबर लागला होता, मला ५६ टक्के मार्क पडले होते, ते पण विदाऊट कॉफी. मी पण गुरुजी राहिलो असतो गुलाब गुरुजी… पण मी काही डीएडला गेलो नाही बाबा, असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. पुढे ते असेही म्हणाले, नाटकांमध्येही मी चांगलं काम करायचो, गाणं म्हणणं, नाट्य छटा सादर करणं हा माझा छंद होता. एका सिरीयलमध्ये सुद्धा मी काम केलं त्यावेळी मात्र त्यावेळी पाहिजे तशा सर्व गोष्टी नव्हत्या. त्या नाटकातून निघालो आणि राजकारणाच्या नाटकात आलो. इथं तर राजकारणाची भलेभले मोठे दुकान आहे. लोकांना वाटतं पुढार्यांची खूप मजा आहे मात्र आम्हाला वाटतं गुरुजींची खूप मजा आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी अनेक बालपणाचे किस्से सांगितले.