आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सर्वच पक्ष संघटना सक्रिय झाल्या आहेत. अशातच आता परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेवून जनतेशी संवाद साधला जातोय. तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे. दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यात कोणताही पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. कृषिमंत्री केवळ एकट्यापुरते पाहतात त्यांची हुकूमशाही मतदार संघात असून अराजकतेचे राज्य सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. त्यामुळे इथला मतदार परिवर्तन करणार आहे. दरम्यान संध्याकाळी दर्शन घेऊन येणारे लोक कादर खानचा रोल करतात असं म्हणत देशमुख यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे.