सोलापूर, ८ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून ओबीसी समाज आक्रमक झाला असून धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय. या आंदोलकांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून याबाबत जाहीर निषेध नोंदवला आहे. तर धनगर समाजातील आंदोलक शेखर बंगाळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला डावलण्याचं काम प्रत्येक सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. म्हणून शासनाच्या निषेधार्थ आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाच्या प्रश्नानांकडे शासनाने लक्ष द्यावे, यासाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने धनगर समाजाचं आरक्षण आणि त्यासंबधीची अंमलबजावणी त्वरीत करावी, अशी मागणी शेखर बंगाळे यांनी केली आहे.