एकनाथ शिंदे यांचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा एकदा वादंग निर्माण झालंय. गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याबद्दल काढलेल्या एका वक्तव्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अर्थखातं नालायक असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील जोरदार उत्तर दिलंय. गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीत कोणतंही समन्वय नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे गुलाबराव पाटलांचा रोख नेमका कुणावर होता? याबद्दल खुलासा करावा, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. गुलाबराव पाटील जे म्हणाले ते खरं असल्याचे दानवे म्हणाले तर मविआच्या काळात आम्ही अजित पवारांची तक्रार आम्ही केली होती, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.