‘सातच्या आत घरात’ चा आग्रह फक्त मुलींसाठीच का करता? असा सवाल करत ‘सातच्या आत घरात’ यायला मुलांना का सांगत नाही? असा सवाल हायकोर्टाने केला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने असा सवाल केला आहे. मुलांना महिलांचा आदक करायलाही शिकवा, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. तर ‘काय बरोबर, काय अयोग्य हे मुलांना का शिकवत नाही? मुलांनी काय करू नये, हे तुम्हाला सांगावे लागेल. समानता शिकवली नाही तर कितीही कायदे असले तरी ते मदतीला येणार नाहीत.’, असे मतही हायकोर्टानं नोंदविलं आहे. बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखण्यात याव्यात, याची शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावे सुचविण्याची सूचना न्या. रेवती मोहिते – डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना केली. यावेळी कोर्टाने काही थेट सवाल उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले.