मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी या भागात जोरदार पाऊस बरसतोय. तर आज मुंबईत सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. दादर, वरळी या ठिकाणी देखील पावसाची रिमझिम सध्या सुरू आहे. अशातच येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देखील वर्तवण्यात येत आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे वरळी तसेच दादर या सखल भागात पाणीदेखील साचल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मंगळवारी हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबईत ग्रीन अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यासह विदर्भात देखील यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे.