कोकणवासियांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कोकणासाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कोकणातील सौंदर्य बहरल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी कोकण किनारपट्टीवर नैऋत्य मोसमी पावसानं वेग धरला आहे. सकाळपासूनच रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहे. तर कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असल्याने बरसत असलेल्या पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पातळीत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानं मुंबईकरांची चिंता वाढवणारी शक्यता वर्तविली आहे. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे. मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. जुलै महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.