गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर डोंगरदऱ्यांच्या दुर्गम परिसरात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काल रात्री, मध्यरात्री नाशिक शहरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळ सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने नाशिकमधील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.