महाराष्ट्रातील पावसासंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज पुणे आणि नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याला पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे यंदा जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात जूनमधील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी मुंबईत मात्र सुमारे ३५ टक्के तूट आहे.मुंबई शहरात ३० जूनपर्यंतच्या सरासरी पावसाच्या तुलनेत सांताक्रूझ येथे १९०.२ मिमी तर कुलाबा येथे ३५.३ मिमी कमी पाऊस झाला. मुंबईसह परिसराला आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याचे पाहायला मिळाले.