हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर भिवंडी शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. कधी हलक्या तर मध्येच जोरदार पाऊस सरी बरसत आहेत. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरात हाहाकार उडला आहे. भाजी मार्केट, नझराणा सर्कल, तीन बत्ती, मंडई, शिवाजी चौक या भागात गुडघाभर पाणी साचले. तर भिवंडी शहरातील खाडीलगत असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीत तीन फूटपर्यंत पाणी शिरले आहे. या ठिकाणी पालिका आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही मदतीसाठी पोहचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावरील कशेळी काल्हेर या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. येथील रस्त्यावर सुमारे दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने असंख्य वाहनांचा वेग मंदावला असून यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनांना मार्गक्रमण करावे लागत आहे. तर अनेक दुचाकी वाहने या पाण्यातून जात असल्याने बंद पडली त्यामुळे दुचाकी चालकांना वाहने पाण्याबाहेर काढून त्यांना सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.