मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | टोलच्या वाढत्या दराबाबत मनसे बऱ्याचदा आक्रमक होताना पाहायला मिळाली आहे. अशातच मुंबईमध्ये प्रवेश करणं आता महाग होणार आहे. आजपासून मुंबईतील पाच टोल नाक्यावर अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. कारण प्रशासनाकडून टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसरमधील टोल दरात वाढ झाली आहे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून टोल दरात वाढ करण्यात आली आहे. जवळपास 12.50 ते 18.75 टक्क्यांनी ही वाढ झाली असल्याने आता आजपासून मुंबई आणि उपनगरात ये-जा करणाऱ्या वाहनांना टोलसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. मुंबईत सध्या चारचाकी वाहनांना 40 रुपये टोल आकारला जातो. पण हाच टोल 45 रुपये इतका होईल. पाचही टोल नाक्यांवर मिनी बससाठी 65 रुपये टोल आकारला जात होता. पण आता हाच टोल 75 रुपये इतका आकारण्यात आला आहे.