मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरुन, गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचा इशारा दिला. बीडच्या माजलगावात अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचं मराठा आंदोलकांनी घर पेटवलं. तर बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही घराची जाळपोळ करण्यात आली. अशा प्रकारे घरं जाळणाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 नुसार कारवाई होणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय. बीडमध्ये ज्या पद्धतीनं तोडफोड आणि जाळपोळ झाली. जी जाळपोळ झाली. त्यामागे काही राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते असून सीसीटीव्हीच्या आधारे ते उघडे पडतील असा इशाराही फडणवीसांनी दिलाय. या घटनेची सरकारनं गांभीर्यानं घेतलं असून कडक कारवाईची तयारी फडणवीसांच्या गृहखात्यानं घेतलीय. जरांगे पाटलांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन करत, मी पाणी पितो पण तुम्ही उद्रेक करु नका,असं म्हटलंय. तर याआधी मराठ्याचे लाखोंचे 57 मोर्चे शांततेत निघाले. अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषणही शांततेत सुरु आहे. मात्र, आता आंदोलन हिंसक होताना दिसतंय. त्यामुळं फडणवीसांनीही हिंसेला थारा नाही, म्हणत कारवाईचे आदेश दिलेत.