पुणे, ८ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. तर अजित पवार यांनी जुलै महिन्यात पार झालेल्या पावसाळी अधिवेशनात सुमारे ४१ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या. यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करून वारेमाप आश्वासनं द्यायची, १०० कोटींचं काम जाहीर करायची आणि २ कोटी त्याला द्यायचे त्यानंतर त्याचं टेंडर काढायचं आणि ती कामं पुढील चार वर्ष सुरू ठेवायची…अशी सध्या अनेक प्रकल्पांची स्थिती असल्याचे जयंत पाटील म्हणाले.