कल्याण आणि डोंबिवली शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पावसाने सकाळी काहिशी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने कल्याण आणि डोंबिवली शहरात पुन्हा जोर धरला. गेल्या काही तासांच्या मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी चौकात गुडघ्याभर पाणी साचले असून वाहतूक कोंडी झाली आहे. या पावसाने कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी तर काही ठिकाणी पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. अधून मधून पावसाचा जोर कमी होत असला तरी सकल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र पाण्याचा जोर कायम राहिला तर अनेक सकल भागत मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिल्यानुसार पावसाचा जोर कायम आहे.