अहमदनगर, २१ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे तर यानिर्णयाविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेला नाशिक जिल्हा येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांची शिखर समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी पाठिंबा देण्याच्या तयारीत असताना नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंदला किसान सभेने पाठिंबा दर्शविला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी बंदला पाठिंबा द्यावा, राज्यातील बाजार समित्या बंद ठेऊन रस्त्यावर उतरण्याचे आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिले आहे. इतकेच नाही तर केंद्र सरकारच्या सततच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही केले आहे.