राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाचा रेड अलर्ट तर जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड आणि अकोल्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये हलक्या आणि मध्यम सरी कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. यासह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात काही ठिकाणी पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या २४ तासांसाठी मराठवाडा, विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात ही याचा प्रभाव असणार आहे. आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. तर येत्या ४ सप्टेंबरपासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे’