Manoj Jarnage Patil Video : ‘…तो घोटाळेबाज अन् लफेडबाज; आता गप्प नाही बसणार मागे लागणारच’, दमानियांच्या गौप्यस्फोटावर जरांगेंचा इशारा
'मी आता मागे लागणारच आहे. मी ज्या- ज्या वेळेस मागे लागतो, तेव्हा माणसाला टेकवितोच त्या शिवाय आपण गप नाही बसतं. आपण टेकविणार म्हणजे टेकविणार'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज भर पत्रकार परिषदेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल २७५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज, लफेडबाज आहे. राज्याला तो मोठा दुर्देवी डाग आहे,’, असं म्हणत जिव्हारी लागणारी टीका मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केली. ते असं म्हणाले, ‘गोरगरीबांची, शेतकऱ्यांची, ओबीसींच सहकार्य घ्यायच आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड आहे. गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं, त्यांनाच मग चुरून खायचं. ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. ती आता उघडी पडली. आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले. या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल, तर सरकार त्याला जवळ करतच कसं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे.’ पुढे जरांगे असंही म्हणाले, “बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात जाती- पाती ओबीसीची संबंध नाही. पाप करायचं, गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा खायचा. गोरगरीबांना मिळून द्यायच नाही, गोरगरीबांचा कैवारी असं बीड जिल्ह्याला दाखवायचं. आता जनतेचे डोळा उघडतील. बीडची जनता धनंजय मुंडेला माफ करणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.