मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : वेगळं आरक्षण देण्याचा विचार ही सरकारची मोठी चूक आहे. छगन भुजबळ यांचं ऐकून सरकार मुद्दा वेगळ्याच दिशेला नेत आहे, असे वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवर बोलताना म्हणाले. तर दोन तीन जणं फक्त तिकीटासाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी करताय पण आमची मूळ मागणी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ‘कालपासून भुजबळ चलबिचल झालेत. सरकार त्या एकट्याचं ऐकून मुद्दा वेगळ्या दिशेला नेताय. पण तुम्हाला त्याची गरज आहे पण आयुष्यभर करोडो मराठ्यांनी गुलाल फेकलाय त्याचं काय?’, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. दरम्यान, आम्हाला वेगळं आरक्षण नको तर ओबीसीमधूनच हवं, या मागणीवर जरांगे पाटील ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा म्हटले.