जालना, २० जानेवारी, २०२४ : सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष कायदा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. अंतिम आंदोलन करणार असल्याचा निर्धार व्यक्त करत लाखो मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील येत्या २६ तारखेला मुंबईत धडकणार आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज अंतरवलीतून मुंबईकडे मोर्चा निघाला आहे. या मोर्च्याला सुरूवात होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आता मागे हटायचं नाही, असा पवित्रा व्यक्त करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी अश्रू अनावर झालेत. शेकडो माता-माऊलींच्या कपाळाला कुंकू राहिलं नाही. इतका निर्दयीपणा या सरकारच्या मनात असू शकतो. आता या सरकारला नीट केल्याशिवाय मराठ्यांना शांत बसून चालणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.