मुंबई, ४ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणावरून सरकारला थेट इशारा दिलाय. सरकारने गाड्या रोखण्याचा किंवा डिझेल बंद करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात दूध आणि भाजीपाला बंद होईल. तर गनिमी काव्याने मुंबईत मराठे धडकणार असं सूचक विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं. २० जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईला निघाल्यावर कुठे थांबायचं, व्यवस्था कशी करायची यावर चर्चा झाली. ३ कोटी मराठे मुंबईत धडकणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर एकाही मराठ्याने घरी राहू नये, असं आवाहन त्यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत डॉक्टर, वकील, अॅम्ब्युलन्स हजर असणार आहे. यावेळी त्यांनी मराठ्यांशी संवाद साधला आणि मुंबईपर्यंत येण्याचा रोडमॅप सांगितला.