लोकसभा निवडणुकीत नाव न घेता पाडलं, आता विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन पाडणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं असून त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. विधानसभेच्या २८८ जागांवर नाव घेऊन पाडणार असल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं. ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुणाचंही नाव घेतलं नाही तरी मला जातीवादी ठरवलं. याचा अर्थ आम्हाला लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र नाही’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, त्यांनी बोलायचं पण आम्ही बोलायचं नाही. आम्ही पाडा म्हटलं त्यांनीही एकमेकांना पाडा म्हटलं…त्यावर कुणाचा आक्षेप नाही फक्त आम्ही पाडा म्हटलं की, आमच्यावर आक्षेप घेता. तर यावेळी २८८ जागांवर नाव घेऊन पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.