पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील परिस्थिती गेल्या दोन दिवसांपासून हिंसक वळणार येऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली तर काही ठिकाणी महामार्गच अडवले. आज अहमदनगर, सोलापूर महामार्ग आंदोलनकर्त्यांनी अडवला. तर पुणे येथे नवले पुलावर आंदोलन करून मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. नवले पुलावर मराठा आंदोलक आक्रमक होत त्यांच्याकडून नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ करण्यात आली. यावेळी त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्गही रोखला. यासह मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक आडवली. तर दुसरीकडे नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.