राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना गणेशोत्सव हा सण तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे राज्यभरातील लालपरीची चाकं थांबली आहे. दरम्यान, आज एसटी कर्मचाऱी कृती समिती आणि मंत्री उदय सामंत यांची राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या मुद्यावरून बैठक झाली. यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव तोंडावर असल्याने संप मागे घेण्याची विनंती केली. पुढे ते असेही म्हणाले की, सण आहे, सरकार सकारात्मक असताना, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलन कशासाठी? असा सवाल उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केला. तर ४८ तासांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर बैठक होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर असताना असं आंदोलन करणं कितपत योग्य आहे. याने जनतेतही उद्रेक होऊ शकतो, असेही उदय सामंत म्हणाले.