पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, असा विश्वास बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत आज प्रहार संघटनेची मोठी आणि महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीमध्ये प्रहार संघटना मोठा निर्णय घेणार आहे. महायुतीसोबत राहयचं की नाही? याचा फैसला प्रहार संघटनेकडून आज करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मला सरकार मंत्रिपद देणार नाही आणि सरकारने दिलं तरी मी मंत्रिपद घेणार नाही, असंही मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. पुढे बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्यासारखा आत्मघातकी निर्णय घेऊ नये. जरांगे आहेत तर समाज आहे. त्यांनी उपोषण न करता दुसरा पर्याय निवडावा. त्यांनी विधानसभा लढवावी आणि लढवली तर 60-70 जागा त्यांना मिळतील असं चित्र महाराष्ट्रात असल्याचे बच्चू कडूंनी म्हटलं.